शासकीय हमीदराने सोयाबीन खरेदी (Soyabina kharedi) प्रक्रियेत सुरुवातीपासूनच विविध स्वरूपातील अडथळे निर्माण झाले. या गोंधळातच अखेर ६ फेब्रुवारीला खरेदी प्रक्रियेची मुदत संपुष्टात आली. मात्र, अजूनही वाशिम जिल्ह्यातील एसएमएस (SMS) प्राप्त ४ हजार २६६ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले नाही.
प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे हमीदराने सोयाबीन खरेदीस आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शासनाने हंगाम २०२४-२०२५ मध्ये ४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल इतक्या हमीदराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात 'मार्केटिंग फेडरेशन'च्या पाच खरेदी केंद्रांवर एकूण १९,०९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन (Online) नोंदणी केली. त्यापैकी १०,१५४ शेतकऱ्यांना माल खरेदीस घेऊन येण्यासंबंधी एसएमएस (SMS) प्राप्त झाले.
परंतु विविध अडचणींमुळे अखेरच्या मुदतीपर्यंत (६ फेब्रुवारी) केवळ ५ हजार ८८८ शेतकऱ्यांचेच १ लाख ५५ हजार ६९० क्विंटल सोयाबीन मोजून घेता येणे शक्य झाले असून, ४ हजार २६६ शेतकऱ्यांना शासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका बसला आहे. ही बाब लक्षात घेता खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
२८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी प्रक्रियेस मुदतवाढची मागणी
६ फेब्रुवारी ही अंतिम मुदत संपल्यानंतरही ४,२६६ शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजून घेता येणे 'मार्केटिंग फेडरेशन'च्या केंद्रांना जमलेले नाही. यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत सापडले असून, खुल्या बाजारात मालाची विक्री केल्यास त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शासनाने हमीदराने सोयाबीन खरेदी प्रक्रियेस किमान २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे.
खुल्या बाजारातील दर ९०० ने कमी
खासगी बाजारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर ४,८९२ या हमीदराच्या तुलनेत ८०० ते ९०० रुपयांनी कमी आहेत. अशा स्थितीत 'नाफेड'कडून खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ न मिळाल्यास शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोयाबीन खरेदीत अडथळ्यांची शर्यत
मालात अधिक आर्द्रता : सुरूवातीच्या काळात सोयाबीनमध्ये १२ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रता असल्याचे कारण समोर करून 'नाफेड'कडून अनेक शेतकऱ्यांचा माल नाकारण्यात आला.
बारदाना टंचाई : खरेदी केंद्रांवर पोती (बारदाना) वेळेत उपलब्ध न झाल्याने, तसेच मध्यंतरी बारदाना संपल्याने खरेदी प्रक्रिया वारंवार प्रभावीत झाली.
गोदामात जागेचा अभाव : खरेदी केलेले सोयाबीन साठवण्यासाठी मध्यंतरी वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये पुरेशी जागा शिल्लक नसल्याने खरेदी प्रक्रिया थांबली.
ज्या नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजून घेता येणे शक्य झाले नाही, त्यांना आणखी काही दिवस मुदतवाढ द्यावी. ते शक्य होत नसल्यास भावफरकाची रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. - नत्थुजी कापसे, माजी जि. प. सदस्य
'मार्केटिंग फेडरेशन'कडे झालेली नोंदणी | १९,०९० |
एसएमएम प्राप्त एकूण शेतकरी | १०,१५४ |
मोजून घेतलेला एकूण माल | १,५५,६९० क्विंटल |
सोयाबीन विक्री झालेले शेतकरी | ५,८८८ |
शिल्लक असलेले शेतकरी | ४,२६६ |
हे ही वाचा सविस्तर : Tur Market Update: तुरीच्या दरात स्थिरता; कसे मिळाले दर ते वाचा सविस्तर